राज ठाकरेंना पत्र लिहून पक्षातील अंतर्गत नाराजी केली व्यक्त; संघटनात्मक वागणुकीवर गंभीर आरोप
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मुंबईत आणखी एक धक्का बसला असून माहीम प्रभागातील माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून पक्षातील अंतर्गत परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वीरेंद्र तांडेल यांनी आपल्या पत्रात पक्षात संघटनात्मक पातळीवर अपमानास्पद वागणूक दिली गेल्याचा आरोप केला आहे. तसेच पक्षामध्ये आता एकजूट, विश्वास आणि कार्यकर्त्यांना सन्मान देण्याची भावना उरलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही योग्य संधी आणि मान मिळाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहीम मतदारसंघातून उमेदवारीसाठी आपण इच्छुक असल्याचे त्यांनी पक्ष नेतृत्वाला कळवले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सातत्याने दुर्लक्षित केल्यामुळेच हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे तांडेल यांनी स्पष्ट केले.
मनसेमध्ये गेल्या काही काळात नेत्यांचे राजीनामे, अंतर्गत मतभेद आणि संघटनात्मक अस्वस्थता उघडपणे समोर येत असून, तांडेल यांचा राजीनामा हा पक्षासाठी चिंतेचा विषय मानला जात आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा राजीनामा मनसेच्या मुंबईतील राजकीय गणितांवर परिणाम करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






