मुंबई: धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाने आता गंभीर वळण घेतले आहे. “जर सरकारने आमची मागणी मान्य केली नाही, तर मी याच ठिकाणी स्वतःचे बलिदान देईल,” असा आक्रमक आणि इशारा देणारा पवित्रा आंदोलक दीपक बोराडे यांनी घेतला आहे. त्यांच्या या विधानामुळे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारची मोठी धावपळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाचे कार्यकर्ते आझाद मैदानावर ठाण मांडून बसले आहेत. समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी विविध जिल्ह्यांतून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. दीपक बोराडे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. “आमच्या पिढ्या आरक्षणाची वाट पाहण्यात गेल्या, आता आम्ही मागे हटणार नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
बोराडे यांच्या ‘बलिदाना’च्या इशाऱ्यामुळे आझाद मैदान परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत, मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा ठोस निर्णय घेणारा प्रतिनिधी येत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
धनगर आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा तापला असून, दीपक बोराडे यांच्या या इशाऱ्यामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. आझाद मैदानावर घोषणाबाजी सुरू असून, पिवळ्या वादळाने मुंबईचा हा परिसर दणाणून गेला आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






