महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप–प्रत्यारोपांचे वातावरण तापले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “आयुष्यभर काँग्रेसला दाबून मटण खाल्लं आणि आता पक्षाला सोडून दिलं,” असे खळबळजनक विधान वडेट्टीवार यांनी केले आहे.
नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षामुळेच मोठे पद, सत्ता आणि प्रतिष्ठा मिळवली. मात्र सत्तेचा फायदा घेऊन पक्षाला अडचणीत टाकण्याचे काम त्यांनी केले, असा आरोप त्यांनी केला.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, “काँग्रेसने अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवलं. संकटाच्या काळात मात्र त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. हे केवळ काँग्रेसच नव्हे, तर नांदेडच्या जनतेशीही विश्वासघात आहे.”
अशोक चव्हाण यांनी अलीकडेच काँग्रेसला रामराम ठोकत वेगळा राजकीय मार्ग स्वीकारला. या निर्णयामुळे नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
दरम्यान, वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अशोक चव्हाण यांच्याकडून या आरोपांना उत्तर दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नांदेडच्या राजकारणात हा वाद पुढील काही दिवस चांगलाच रंगणार, असे संकेत दिसत आहेत.








